बंद

    क्षेत्र उपचार

    मृद संधारणाच्या ज्या अभियांत्रिकी उपाययोजना आहेत त्या अंत्यत खर्चिक असून त्यांचे परिणामही कालांतराने दिसून येतात. यासाठी कमी खर्चिक व लवकर परिणाम देणारी उपाययोजना म्हणून जैविक बांधाचे तंत्रज्ञान विकसीत करण्यांत आले आहे. जैविक बांध म्हणजेच मातीच्या किंवा दगडाच्या बांधाएवढी समपातळी रेषेवर गवत किंवा घायपात या सारख्या वनस्पतींची घट्ट लागवड करुन भूपृष्ठावरुन वाहणा-या पाण्यास अडथळा निर्माण करणे की जेणेकरुन पाण्याबरोबर येणा-या मातीचे कण या ठिकाणी अडतील व स्वच्छ पाणी त्या बांधातून संथपणे वाहून जाईल. पाणी या वनस्पतीच्या जाळयातून वाहून जाऊ शकत असल्यामुळे या बांधास विशिष्ट प्रकारच्या सांडव्याची किंवा बांधास ढाळ देण्याची आवश्यकता रहात नाही. मातीच्या बांधाप्रमाणे हे बांध वाहून जाण्याची किंवा फुटण्याची शक्यता नसल्याने ते कोणत्याही प्रकारच्या तीव्र उताराच्या जमीनीवर देखील घालता येतात. मृद संधारणाचा हा एक स्वस्त व प्रभावी उपाय आहे.

    पाणलोट क्षेत्र योग्य ठिकाणी धानाच्या जमिनीची बांधबंदिस्ती व मजगीची कामे करणे

    ही योजना 1959 पासून सुरु झाली महाराष्ट्राच्या पश्चिम घाट भागात व विदर्भामध्ये जास्त पावसाच्या क्षेत्रात विशेषत: 4-8 टक्के जमिनीच्या उतारावर 10 ते 20 मी. अंतरावर छोटी खाचरे निम्म्या भागांत खोदाई व निम्या भागांत भराई करुन केली जातात या खाचरामध्ये पावसाचे पाणी अडविण्यासाठी बांध घातला जातो. व जादा पाणी सांडीव्दारे सोडून देण्यांत येते. या कामासाठी सर्वसाधारणपणे हेक्टरी खर्च जास्त येतो परंतू नापीकक्षेत्र हे पिकाखाली आणण्यांत येत असल्यामुळे भाताच्या उत्पादनामध्ये वाढ होते ज्या भागांत धानाची बांधबंदिस्ती व भातखाचरे केली जातात तो भाग अत्यंत कमी उत्पादनाचा असल्यामुळे शेतक-यांना उत्पन्नाचे भातशेती हे साधन असल्यामुळे ही योजना अत्यंत परिणामकारक ठरली आहे.

    राज्यातील पडीक जमीन विकास कार्यक्रमातंर्गत बिगर शेतीखालच्या जमिनीत मातीसारख्या अमूल्य अशा विकास माध्यमाचे सरंक्षण करणे मृद व जलसंधारण करणे तसेच वृक्ष व चारा यांचे माध्यमातून स्थानिक लोकांच्या गरजा भागविणे व पर्यावरण संतुलन करणे हा सर्वसाधारण हेतू आहे. कमीत कमी खर्चात मृद व जलसंधारण करण्यासाठी सलग समपातळी चर घेऊन वृक्ष लागवड करावयाची आहे. या कामासाठी जमिनीचा उतार व पर्जन्यमान विचारात घेऊन राज्यांत पडीक जमीन विकासासाठी निरनिराळे आठ नमुने तयार करण्यांत आले असून त्याप्रमाणे कामे करण्यात येत आहेत.

    शेताच्या खोलगट भागात वेगवेगळया आकारमानाचे शेततळे घेण्यात येतात. शेततळयाचा उपयोग पाण्याचा तात्पुरता निचरा होणेसाठी पावसाचा ताण पडल्यास पिकांना सरंक्षित पाणी देण्यासाठी तसेच भूगर्भातील पाणी साठयांत वाढ करणेसाठी होतो. मृद संधारणाच्या व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या नियमित कार्यक्रमा बरोबरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीतून ग्रामपंचायत व कृषि विभागामार्फत शेततळे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.